शिवप्रहार न्यूज- व्यापारी गांधी यांचे अपघाती निधन; मागणी करून देखील प्रशासनाने स्पीडब्रेकर न बसविल्याने संतापाची लाट …

व्यापारी गांधी यांचे अपघाती निधन; मागणी करून देखील प्रशासनाने स्पीडब्रेकर न बसविल्याने संतापाची लाट …
श्रीरामपूर - येथील व्यापारी सुभाष गांधी यांचा काल गुरुवार दि.१४ रोजी रात्री बजरंनगर मध्ये अपघात होऊन त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरातील सागर इलेक्ट्रॉनिक्स चे मालक सुभाष भागचंद गांधी हे काल रात्री साडेआठ वाजता आपल्या घराकडे जात असताना वार्ड नंबर ७, बजरंनगर मधील पूर्णवाद नगर - म्हसोबा महाराज मंदिर रोडवर समोरून येणाऱ्या मोटरसायकलने गांधी यांच्या मोटर सायकल ला जोराची धडक दिली. या अपघातात गांधी यांच्या डोक्याला जबर मार लागून ते जागेवर मयत झाले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. बजरंगनगर मधील पूर्णवाद नगर- म्हसोबा महाराज मंदिर रोडवर स्पीड ब्रेकर बसविण्याबाबत भागातील नागरिकांनी वेळोवेळी मागणी करून देखील या रोडवर अद्याप स्पीडब्रेकर बसविलेले नाही.त्यामुळे गांधी यांच्या मृत्युला जबाबदार रोडचे बांधकाम करणारा ठेकेदार व प्रशासनातील सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी बजरंगनगर मधुन होत आहे. तसेच जर गुन्हा दाखल झाला नाही तर बजरंगनगर मधील नागरिक प्रशासनाविरोधात आंदोलन करून लोकशाही पद्धतीने आपला आक्रोश मांडत राहतील.
व्यापारी गांधी यांचे याच रोडवर अपघाती निधन झाल्याने या भागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.