शिवप्रहार न्यूज -होम आयसोलेशन बंद करून कोवीड सेंटर मध्येच भरती होण्याचे बंधन म्हणजे कोवीड सेंटर वाल्यांना गिर्हाईक देण्याचा प्रकार नाही का ?

होम आयसोलेशन बंद करून कोवीड सेंटर मध्येच भरती होण्याचे बंधन म्हणजे कोवीड सेंटर वाल्यांना गिर्हाईक देण्याचा प्रकार नाही का ?
श्रीरामपूर - शासनाने होम आयसोलेशन(गृहविलगीकरण)मध्ये असणारे रुग्ण सुपर स्प्रेडर ठरत असल्याचा निष्कर्ष काढून नगर जिल्ह्यासह राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन वर बंदी घातली आहे. त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पेशंटला त्याची इच्छा नसली तरी कोविड सेंटरमध्ये जाऊन भलामोठा आर्थिक भुर्दंड सोसून उपचार घ्यावे लागणार आहे.
बहुसंख्य गोरगरीब ,सर्वसामान्य कोरोना पेशंट हे आयसोलेशन मध्ये घरी राहून बरे होत होते. परंतु आता या निर्णयामुळे सर्व सामान्य पेशंट ना त्यांची इच्छा नसताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. कारण शासकीय कोवीड सेंटर वगळता कुठेही मोफत सुविधा उपलब्ध नाही. त्यात शासकीय कोवीड सेंटर मध्ये खुप कमी लोक जातात.
बहुतांश खाजगी कोवीड सेंटर हे धंदेवाईक झालेले असून कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे त्यांना आता पेशंटची कमतरता भासत आहे.अनेक स्वार्थी लोकांनी स्वत: डॅाक्टर नसतांना भाडोत्री डॅाक्टरांना कामावर ठेवुन धंदेवाईक कोवीड सेंटर सुरु केले असुन त्यातुन एकीकडे सामाजात कोवीड सेंटर सुरु केले म्हणुन प्रतिमा उंचावुन घेणे व दुसरीकडे “खिसे भरण्याचे ” काम चालु आहे. त्यात शासनाच्या अशा निर्णयामुळे या धंदेवाईक कोवीड सेंटर वाल्यांना मोठ्या प्रमाणात गिर्हाईक मिळून त्यांचा चांगला धंदा होणार यात शंका नाही. दुसरीकडे मात्र गोरगरिबांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
आधीच लॅाकडाऊन चालू असल्यामुळे आर्थिक डबघाईस आलेल्या गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना खाण्याचे वांदे झाले असतांना आता शासनाच्या या निर्णयामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लॅाकडाऊन उठून सर्वसामान्य नागरिकांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याऐवजी शासन जर अशा प्रकारचे निर्णय घेऊन कोविड सेंटर वाल्यांना गिराईक देणार असेल आणि सर्वसामान्यांच्या पोटावर लाथ मारणार असेल तर सर्वसामान्यांनी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण झालेला आहे.